काही व्यक्तिरेखा चिरतरुण असतात आणि त्या सदैव जिवंत राहतात. माझ्या मनात चिरंतर घर करून राहिलेल्या काहींविषयी मी आज इथे लिहिणार आहे. साधारण अकरा वर्षांची असताना मी पहिल्यांदा चार्ल्स डिकन्स लिखित 'ऑलिव्हर ट्विस्ट' हि कादंबरी वाचली. माझ्याच वयाच्या असणाऱ्या एका अनाथ मुलाची ती कथा वाचताना नुसतेच माझे डोळे भरून आले नव्हते तर मी ढसाढसा रडले होते. त्याचे करुण डोळे मला सारखे माझ्या नजरेसमोर दिसायचे. जगात आपल्यासोबत आपली काळजी घेणारं कुणी नसलं कि किती हाल होतात आणि त्यातल्यात्यात एका धोकादायक वास्तविक जगात आपण एकटे असतो हि नुसती कल्पनाच किती भीतीदायक आहे. त्यामुळे ऑलिव्हर बद्दल वाचताना मी खूप संवेदनशील आणि हळवी झाले होते. मी किती सुखासीन आणि सुरक्षित आयुष्य जगत होते याचं मला भान आलं. माझ्या कोवळ्या मनाला अतिशय छेदून काढणारा तो क्षण होता. त्याच दरम्यान व्हिक्टर ह्युगो लिखित आणि साने गुरुजी अनुवादित 'ल मिझराब' हि कादंबरी 'दुःखी' ह्या नावाने मराठीत मी वाचली. लहान असताना आपले भावविश्व किती स्तिमित असते. हि कादंबरी १८६२ मध्ये प्रकाशित झाली होती. साने गुरुजी यांनी लहान म...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"