Skip to main content

पिवळे उन

आज मी बऱ्याच दिवसांनी ट्रेनचा प्रवास केला. तसा नेहमीच करते, पण आज पुस्तक वाचता- वाचता गर्दी कमी असल्याकारणाने बाहेर खिडकीतून बघायला मिळालं. काही विचार डोक्यात आले. जिथे उतरले तिथून ज्या रस्त्यावर पायपीट करायला सुरुवात केली तिथे ताम्रशिंबी अर्थात कॉपर पॉड ची ओळीने लावलेली असंख्य झाडं रस्ताभर मला साथ करत होती. पिवळ्या रंगाची अशी उधळून पाहून मन प्रसन्न झालं. मला उगाच त्या रस्त्यावरून परत येता जाता फिरायला आवडेल असं वाटून गेलं. मी मुंबईतल्या फोर्ट भागातल्या छोट्या रस्त्यांवर अशीच फिरते. एकटीने चालायला मला फार आवडतं. डोक्यात असंख्य विषय असतात, त्यांच्याशी एक द्वंद सतत चालू असतं. चेहरा निर्विकार ठेवून फिरणं आता मला जमतं. पूर्वी मी करत असलेल्या विचारांनी फार गुंगून गेल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर त्रासिक भाव फार पटकन उमटायचे. आता थोडं शहाणपण आलंय. आज रस्त्याने चालताना, ऐन उन्हात त्या पिवळ्या फुलांनी बहरलेल्या झाडांनी फार आत्मिक समाधान आणि शांतता दिली माझ्या विचलित चित्ताला. गेल्या कित्येक दिवसांपासून सारखं माझी फार घालमेल होतेय, सतत अजून न घडणाऱ्या गोष्टींनी मला फार चिंतातूर केलंय. कोणाशी बोलून मन मोकळं करायचा पण पर्याय नाही. कोणाला सांगणार आणि काय? लिहून देखील मनातल्या भावनांना वाचा फुटत नव्हती, ती आज एका उन्हातल्या चालण्याने झाली. खरंच आहे तर, आपण सतत कुठल्यातरी ध्यासाचा पाठलाग करत असतो आणि त्याच्या पाठीमागे धावता धावता आपली दमछाक होते, सैरभैर होतो आपण पण थांबत मात्र नाही. कारण थांबण्यात आपल्याला कमीपणा वाटतो, किंबहुना आपण कधी थांबायचा विचारच करत नाही. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं, जो थांबला तो संपला म्हणून आपण कधी विश्रांती घेतंच नाही. असो. 

इतक्या उन्हात लांबवर मी चालत होते आणि विचारांची घोडदौड देखील सुरूच होती. तितक्यात एका लायब्ररीचा बोर्ड बघितला दुरूनच. नवीन चष्मा घेतल्यापासून आता मला लांबचं अगदी छान दिसतं. बोर्ड बघूनच मी खुश झाले आणि तत्परतेने आत गेले सुद्धा. तिथे पुस्तकांच्या रांगा बघून छान वाटलं. छोटीशीच जागा, त्यामुळे अगदी गर्दी करून दाटीवाटीने पुस्तकांना तिथे मांडलेलं बघून अगदी आनंदाची उडी मारली मी मनातल्या मनात. पुस्तकांच्या सानिध्यात तर अगदी टळटळीत दुपार देखील अगदी मजेत सरून जाते माझी.

आज खूप मोकळा श्वास घेतला मी त्या पिवळ्या फुलांच्या सोबतीत. तसंच त्यांना बघत अखंड चालत राहिले असते मी. मनभर पसरला तो रंग. गुलमोहराचा लाल असाच मनाला एक उभारी देतो, शब्दांच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. मला फक्त एक उनाड मोकळा रस्ता आणि त्याच्या दुतर्फा निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर डुलणारी पिवळी फुलं साद देत होती. 

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु