Skip to main content

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची अवीट गोडी अनुभवली. 


काही दिवसांपूर्वी घराजवळ असणाऱ्या लायब्ररीत गेले होते तेव्हा 'गौरी देशपांडे' ह्या नावाचं शेल्फ दिसलं. लगेच एक पुस्तक घेतलं  आणि त्याचाच अनुभव इथे लिहितेय. पुस्तक होतं 'दुस्तर हा घाट आणि थांग.'

एखादी शोकांतिका वाचावी आणि मग उरातली सगळी बेचैनी, सगळ्या जुन्या आठवणी उसळी मारून वर याव्यात, असच काहीसं माझं झालं. 
मी फार गुंतून जाते गौरी देशपांडेच्या सगळ्याच व्यक्तिरेखांमध्ये आणि नमू, भाई, वनमाळी, Alistair ही देखील याला अपवाद नव्हती. 
खरंतर, आता त्यांची जवळजवळ सगळीच पुस्तकं मी वाचली आहेत पण तरीही प्रत्येक नवीन कथेत फार मोठं आयुष्याचं गमक मला आढळतं. 
खूप भावनाविवश करतात हि सगळीच माणसं! 
आणि हि सगळी मंडळी जरी त्यांच्या गुणदोषांसकट आपण स्विकारलीत ना, तरी मग त्यांच्या सर्व वागण्यावर आपल्याला कधी राग, तर कधी अपार प्रेम करावसं वाटतं. कधी हतबल देखील होतो आपण, नी कधी सगळचं त्यांच्यावर सोपवून आपण अगदी मुक्त पक्षी होतो. 

एका स्त्रीची घुसमट, तिचं एकटेपण, तिच्या भावविश्वाचा इतका सुंदर उलगडा खचितच कुणी केला असेल. त्या तिच्या, कधी आनंदी तर कधी अतीव दुःखी अशा प्रवासाचा मागोवा आज तीस-चाळीस वर्षांनंतर देखील, एवढा प्रकर्षाने आपल्या मनाला भिडावा हे चांगलं कि आजच्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये काहीच कसा बदल झाला नाही म्हणून वाईट वाटावं? फार, फार, जटील प्रश्न मनाला पोखरून काढतील आणि त्यांची उत्तरं आपण शोधत राहू, असंच जीव मुठीत घेऊन जगताना! 


मी जितकी वाचतांना गुंतले तितकंच गौरी देशपांडे ह्या लिहिताना गुंतल्या असतील का?

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले.  एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय.  नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या.  इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच