Skip to main content

मनात माझ्या


(Artwork by Jonathan Kwegyir Aggrey)


रविवारी वर्तमानपत्रात 'इस्तंबुलचा सुगंध' म्हणून एक लेख वाचला. त्यातली छायाचित्रं पाहून मला ओरहान पामुक यांच्या 'इस्तंबूल' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली. आणि वाचता वाचता माझा कुठल्यातरी गोष्टीवरून बहिणीशी खटका उडाला, हे लिहिताना माझा हात किती कापरा झालाय. सर्वांची दृष्टी निराळी हे मान्य पण एखाद्या गोष्टीवर एवढी टोकाची भूमिका का असावी? आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी ऐकून घेण्यात काय वाईट आहे? किंबहुना हा समजूतदारपणा दाखविण्याचा थोडा प्रयत्न तरी आपण करू नये का?

बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला सुद्धा. वाचायला तर खूप काही घेतलय, लिहायला देखील, ते कागदावर मांडायला हवं तेवढं वेळेवर. बऱ्याचदा गोष्टी मनातच राहून जातात, त्या सांगितल्या जात नाहीत, मग त्यांची घुसमट होते, त्या तिथेच दबल्या जातात. एखाद्या नॉस्टाल्जिक संध्याकाळी मग त्या आपल्याला आठवतात. त्यावर आपण मनातल्या मनात तेव्हाही उहापोह करतो पण त्या व्यक्त होतच नाही. ही आठवण मग कितीतरी वर्ष आपल्याला सतवत राहते. आणि कधीतरी मग अशी कागदावर उतरते. सांगायचच झालं तर पामुक. मला लेखक म्हणून अतिशय आवडणारा माणूस, आणि म्हणूनच एकाद्या घनिष्ट मित्रासारखा वाटणारा. त्याच्या बोस्फोरस नदीकाठच्या फेऱ्या मला माझ्या मरीन ड्राईव्हवरच्या बैठका वाटतात. समुद्राला बघत विचार करण्यात जो एक दुर्दम्य आशावाद मनाला उभारणी देतो तो अन्यत्र कुठे मला मिळत नाही. कुठेतरी माझी आनंदाची व्याख्या आणि संकल्पना चुकते असंही वाटतं. पण आपण किमान बरोबर व चूक यातला फरक ओळखण्याइतपत सुजाण नाही का झालेलो? वास्तव आणि कपोलकल्पित यांत सध्या किती सूक्ष्म अंतर राहिलंय. आपण आभासी दुनियेत वावरतोय, आणि त्यात किती गुरफटलोय याचं देखील भान आपल्याला उरलेलं नाही. भौतिक गोष्टींचा हव्यास आणि आत्ममग्नता यामध्ये आपण स्वतःला अडकवून ठेवलय. सगळ्या गोष्टींना एक किंमत ठरवलीय आणि तिला अवाजवी महत्व प्रदान केलय. आज मला दु:खी वाटतंय म्हणून मी एखादं आनंदी गाणं ऐकते आणि त्या दु:खाला क्षणिक निरोप देते. पण ते दु:ख परत येतच आणि आपण त्यात गुंतून राहतो. कितीतरी काळ असा हा छुपा संघर्ष आपण करत असतो, मनातल्या मनात. शारीरिक व्याधींनी जितके आपण त्रस्त असतो, त्याहून कैक पटीने मानसिक विकारांनी आपण गांजले जात आहोत. यावर उपाय काय?

म्हणून मनातलं मनमोकळेपणाने व्यक्तं करावं कधीतरी, व्यस्तं पळणाऱ्या आयुष्यातून. आपल्या भावनांना वाट करून देणं थोडं कठिणच पण अशक्य नाही. माझ्या मनात पामुकचे शब्दच रुंजी घालायला लागतात. समुद्रावर फिरत असताना, लाल नभाकडे पाहताना जे हृदयात गाणं उमटतं त्याला सूर द्यावा आणि पक्ष्यांच्या थव्याला दूरवर उडतांना नाहीसे होईपर्यंत बघत आपली नवीन वाट आपण रेखावी. आपला आनंद आपणच शोधावा आणि तो जगावा सुद्धा एखाद्या आनंदयात्री प्रमाणे! 

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले.  एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय.  नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या.  इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच