Skip to main content

मनात माझ्या....

आज रविवार. सकाळी गच्चीवर फिरताना सभोवताली नजर फिरवली आणि गेल्या कित्येक वर्षात ह्या परिसरात रहात असताना झालेल्या बदलांचा मी मागोवा घेतला. पूर्वी सगळीकडे इथे घनदाट झाडांच्या रांगा होत्या, रस्त्याच्या दुतर्फा आणि पार डोंगरापर्यंत. मग हळूहळू मानवी वस्ती वाढायला सुरुवात झाली. आधी छोटी तुरळक घरं दिसायला लागलीत मग तीन मजली इमारती आणि आता तर टोलेजंग दहा ते पंधरा मजली गगनचुंबी इमारती. जणू आकाशाला गवसणी घालण्याकरिता त्यांच्या सगळ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली. मला आता दिसताय त्या दूर क्षितिजावर धुरकट पण तरी डौलदार अशा डोंगर रांगा. लांबून त्यांच्या स्थिर दिसणाऱ्या रेघा पाहिल्यावर एखाद्या कुंचल्याने आकाशाच्या पटलावर किती अलगद सहज रंग उमटले असा भास माझ्या मनाला स्पर्शून गेला.  

वारा देखील मनातल्या आठवणींना पिंगा घालत होता. मला आठवला पावसाळ्यातला तो दिवस जेव्हा आम्ही पहिल्यांदा या नवीन घरी पाऊल टाकलं होतं. नुकत्याच सरी येऊन गेल्या होत्या आणि सगळा आसमंत मातीच्या घमघमाटात प्रसन्न भरला होता. झाडांवर पावसाचा शिडकावा इतका आल्हाददायी भासला होता. पूर्वी कधीच इतकं जवळून निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळाली नव्हती. ती इथे आम्हाला पुरेपूर उपभोगता आली. इथला प्रत्येक ऋतू आणि त्यातली संथता, या आधी घड्याळाच्या तालावर नाचत असताना जी आमच्या हातून निसटली होती त्या निरव शांत जगण्यात आम्हाला घेऊन गेली. सप्टेंबर मध्ये कोसळणारा पाऊस, ऑक्टोबर ला सुरु होणारी सौम्य थंडी, डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत कुडकुडणारी तरी आवडणारी गोठवणारी थंडी, मार्च ते मे पर्यंत अगदीच उकाडा नाही पण उन्हाळा आहे याची जाणीव करून देणाऱ्या या असंख्य मोसमातल्या बदलांचा आम्ही अनुभव घेतला. इथे आल्यापासून मी परत एकदा रंग आणि कुंचला हातात घेतला, मनातल्या साऱ्या तरल अनुभूती कॅनव्हासवर उमटल्या; कधी रेषा, रंग आणिक शब्दांच्या रूपात. रोज संध्याकाळी आणि रात्री रेडिओवर जुनी गाणी ऐकताना परत त्यातली गोडी अनुभवली. इथे आल्यावर जणू अंतर्मनाने देखील मोकळा श्वास घेतला. एका लांब सतत चाकोरीबद्ध दैनंदिनीत अडकलेल्या मनाला आणि शरीराला देखील नवीन पालवी फुटली एका अर्थाने. 

चालता चालता इतके विचार मनात रुंजी घालत होते... त्या सर्वांनाच शब्दात इथे मांडणं शक्य नाही पण इतकं साधं असतं आयुष्याला जगणं हे मी शिकले. सतत  ध्येयांचा मागोवा करण्यापलीकडे आणि भासांच्या पल्याड देखील जगणं सुकर होऊ शकतं, हे जाणवलं. किती विविध राग रंग आहेत आपल्या असण्याला आणि त्या सर्वांचा थोडा परिचय मला करून घेता आला एवढ्या अवधीत.  भर दुपारी उन्हाच्या तीव्रतेला घरातल्या सावलीतून बघताना मनातल्या गुंत्याला देखील मोकळं करता आलं. रात्री झोपताना खिडकीतून अवचित कधीतरी दिसणाऱ्या चांदण्यांनी भरलेल्या आभाळाला देखील स्पर्श करता आला, आणि सकाळी याच गच्चीवर फिरताना झाडांशी गुजगोष्टी करता आल्यात. खरंच किती सुख आहे! असेच दिवस फुलत राहो आणि हे जीवनगाणे आपण सदैव गात राहो!

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु