Skip to main content

मन मनास उमगत नाही....

आज अप्पांचा वाढदिवस! ब्यांशी वर्षांचे झाले असते अप्पा, आज ह्यात असते तर. 
तीन- चार दिवसांपासून मी अप्पांचा विचार करतेय. या वर्षी, २०२० मध्ये अप्पांना जाऊन १५ वर्षं होतील! सरलीत वर्ष... हळूहळू, कधी फार भरभर. इतके मोठे आम्ही कधी झालो गेल्या दशकात हे उमगलंच नाही. माणसं स्मृतीच्या कुपीत बंद होऊन जातात. कधी आपल्या समोर असतात तरीही विस्मृतीत दाखल होतात. हा स्मृतीचा खेळ फार जीवघेणा आहे. आपल्या नकळत लोकं आपल्या स्मृती पटलावर येऊन ठिय्या मांडतात आणि काही कधीच धूसर होत नाही. जे आता आपल्या सोबत नाहीत, मनाला त्यांची आठवण किती व्याकुळ आणि बेचैन करते. सतत वाटत राहतं- आज अप्पा असते तर गोष्टी किती वेगळया घडल्या असत्या. शेवटी, मन ते! असंख्य गुंतण्याची सवय त्याला. येनकेन प्रकारे स्वतःला रमवण्यात धन्यता मानतं. कुणी असो-नसो, मनाला साथ मिळते ती फक्त आठवणींची.  

काही वर्षांनी, कदाचित या आठवणींची धार पुसट होईल. तेव्हा देखील मी अशीच भावनावश होऊन लहानपण आणि त्यातलं रम्यपण कुरवाळीन. अप्पांची प्रेमळ हाक, आम्हाला बघताच पेपर दूर सारून गेट जवळ येऊन आम्हाला घट्ट कवेत घेणं; संध्याबाई, अलकाताई अशी आपल्या मुलींना नाव घेत विचारपूस करणं...सारं काही फक्त आमच्या स्मृतीत. त्या काळी व्हिडियो रेकॉर्डिंग करणं फारसं प्रचलित नव्हतं. आता वाटतंय, आमच्या अप्पांचा निदान आवाज तरी आम्ही रेकॉर्ड करायला हवा होता. आपले जिवलग गेल्यावर त्यांची छबी, आवाज, त्यांचा घरातला वावर, त्यांनी वापरलेल्या वस्तू, वाचलेली पुस्तकं.. सगळंच अनामिक होऊन जातं! २००१ मध्ये आमचं बदलापूरला जेव्हा नवीन घर झालं तेव्हा कामगारांवर देखरेख करायला जवळपास १५-२० दिवस अप्पा आले होते. रोज दुपारी शाळेतून आल्यावर दार उघडायला तेच समोर असायचे. किती प्रसन्न हसून स्वागत करायचे. खिडकीशेजारी पुस्तकांच्या शेल्फजवळ ते एका खुर्चीत बसलेले असायचे. हीच त्यांची अखेरची छबी माझ्या मनावर कोरली गेलीय. त्यांनतर फार क्वचित ते घरी येऊन राहिलेत. 

ते गेले, हेदेखील आम्हाला मध्यरात्री कळलं. १५ दिवसांपूर्वीच आम्ही त्यांना भेटून आलो होतो. माझ्या वाढदिवशी त्यांनी मला फोनवर शुभेच्छा देखील दिल्या होत्या. हेच आमचं शेवटचं बोलणं. दरवर्षी, त्यांच्या वाढदिवशी संक्रांत असते आणि दरवर्षी, मी त्यांच्या आता कधीच न साजरा केल्या जाणाऱ्या वाढदिवसाबद्दल विचार करते. अप्पा ६७ वर्षांचे असताना गेले. त्यांची पंचाहत्तरी आम्ही फार जोशात साजरी केली असती. तोपर्यंत आम्हीदेखील थोडे कमावत्या वयाचे झालो असतो. केवढा अभिमान आणि आनंद झाला असता त्यांना! आज जर ते असते, तर माझ्या यूरोप प्रवास आणि जर्मन वास्तव्याबद्दल त्यांना केवढं कौतुक वाटलं असतं. आज अप्पा असायला हवे होते. कितीतरी गोष्टी त्यांना सांगायच्या राहून गेल्यात, आमचे उडण्या-बागडण्याचे दिवस त्यांनी अजून बघायला हवे होते. 

मनाला खूप काही उमगत नाही...त्या त्या वेळेत. मग असा आठवणींचा महापूर यावा लागतो, मनातला बांध सुटण्यासाठी!

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु