Skip to main content

मन पाखरू पाखरू

हळूहळू मनावरचा ताण सैल झाला. उन्हात बसले, हसले, काही जुन्या गोष्टी आठवल्या. क्षणात सकाळपासून दाटून आलेलं मळभ दूर झालं. आधी छातीत धडधडलं, हात थरथरले, मग काहीतरी माझ्या आत निवळलं. आपल्या मनाला सतत एखाद्या टॉनिकची गरज असते. ते टॉनिक मी बऱ्याच दिवसांत प्यायले नव्हते म्हणून हा सगळा उहापोह. शब्दांमध्ये काय विलक्षण सामर्थ्य असतं! माझ्या मनाला उभारी देणारे, त्याला मोकळं करणाऱ्या मैत्रिणी भेटल्या. क्षणात किती बदल झाले. माझ्या खांद्यांवर एक अनामिक ओझं मी वाहत होते, ते हलकं होत गेलं. आपला आनंद, मनःशांती आपण स्वतः शोधावी लागते. विनाकारण विचारांचं ओझं आपण घेऊन फिरत राहतो. 

ऊन जसजसं वाढत गेलं, तसे मनातले दुःख वितळत गेले. आपल्या अवतीभवती किती सुंदर जग आहे. आपण सगळं विसरून केवळ स्वतः मध्ये रममाण होत जातो आणि मग त्या सातत्याचा देखील कंटाळा येत राहतो. नवीन काहीतरी करण्याची उर्मी विरून जाते. जसा आनंद शोधता यायला हवा, तशीच स्वयं- प्रेरणा देखील आपण जागृत करायला हवी. फार गुरफुटून गेलोय आपण एकाच ध्यासाच्या मागे. सगळे करतात, पूर्ण जग तसंच चाललंय म्हणून त्यांच्यासारखे होण्याचा आणि करण्याचा अट्टहास आता आपण टाकून द्यायला हवा. 

निसर्गातल्या सर्व अभूतपूर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला आता सुरुवात करणं जरूरी आहे. आपल्यातल्या कोवळेपणा जपणं महत्वाचं आहे. मला कित्येक दिवस सतत असं वाटत राहिलं कि मी स्वतःला हरवून बसलेय. नवीन गोष्टी, नवीन वातावरणात एरवी रुळते त्यापेक्षा लवकर रुळले आणि मग त्या झटपट सरावण्यामुळे, स्वतःला वेळचं दिला नाही मी. एरवी माझा वेळ घेऊन त्या प्रक्रियेतून स्वतःला मी घडवते, तो मी इथे केलाच नाही. म्हणून सतत स्वतःला रोज शोधात राहिले. काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी बिनसलंय म्हणून आतल्याआत धुसफुसत राहिले. माझ्या मनातला कुठला तरी रिकामा कप्पा सतत एक ओलावा, एक मायेची तिरीप यासाठी आसुसत राहिला. 

आज अनपेक्षितपणे त्या सगळ्याला मोकळी वाट मिळाली आणि मी मुक्तता अनुभवली. हृदयात काहीतरी अडखळलं होतं, ते निवळलं. किती शांतता पसरलीय माझ्या मनभर! ही अनुभूती यायला, एवढा सगळा घोळ घातला माझ्या मनाने. अजूनही कुठली तरी अस्पष्ट, अव्यक्त ओझं आहेच, पण ते आता इतकं महत्वाचं उरलं नाही. विचार करता करता आणि इथे लिहिताना, कित्येक क्षण स्मरले आणि विरले देखील. खरं म्हणजे, व्यक्त होणे रेंगाळत होते आणि म्हणूनच दडपणाचे   ढग माझ्यावर राज्य करत होते. फुलण्यातला मोकळा श्वास मी घेतला आहे आणि म्हणूनच विझण्यातला आणि बुजण्यातला दुखरा प्रवास मला इतका कष्टी बनवत गेला. 

आता स्वस्थता आहे, निर्विकार शांतता आत पसरली आहे. डोळे मिटल्यावर एका शांत क्षितिजाचा पटल दिसतोय. तीच माझी स्थिरता! आजचा दिवस एक नवीन उमेद घेऊन मी यापुढे स्वतःला सावरेन. निराशा हा जीवनाचा भाग आहे. त्याला तेवढ्यापुरते आयुष्याचा एक घटक मानून पुढे आशावाद टिकवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या कितीतरी आकांक्षा आहेत, त्यांना जगण्याचं आणि उडण्याचं बळ देईन. स्वनिर्मितीचा आनंद घेत राहीन. हे जीवन सुंदर आहे! नुसते गाण्यात नाही तर प्रत्यक्षात जगेन!

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

वेंधळेपणा

काही लोकांना वेंधळेपणा करण्याची एवढी सवय जडली असते कि कितीही त्यांनी काळजीने काम करण्याचा प्रयत्नापुर्वक निश्चय केला तरीही तो कधी तडीस जात नाही. मला माहित असलेल्या काही वेंधळ्या माणसांबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक काम किंवा कृती हि इतरांसाठी तापदायकच ठरते बहुतेक वेळा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना परीक्षेत अभ्यास आठवेल का याचं टेन्शन असतं पण तरीही त्यातल्यात्यात त्यांच्या वेंधळेपणात कुठेही कसूर रहात नाही. अगदी परीक्षेची सामग्री नीट घेण्यापासून ते ओळखपत्र, परीक्षेत व्यवस्थित पेपर लिहिण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये यांचा धांदरटपणा दिसून येतो. अशा लोकांच्या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांच्या परीजनांना भोगावी लागते याचं त्यांना सोयरसुतक देखील नाही. शेवटी काय तर माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो. मला तर अतिशय राग आहे अशा लोकांच्या आप्पल्पोटेपणाची. त्यांच्या जगाचे ते राजे, सगळं भूमंडल फक्त यांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचा यांचा फाजील गोड गैरसमज. आपल्यामुळे समोरच्याला केवढा मानसिक त्रास सोसावा लागत असेल याचा थांगपत्तासुद्धा अशा लोकांना नसतो मु